श्रीमंत दामोदर पंत

shrimanta damodar pant marathi play by bharat jadhav - sadhuwani

त्या दिवशी असाच काही रुईयाच्या मित्रांसोबत बसलेलो, गप्पा मारता मारता सहज एकजण म्हणाला की श्रीमंत दामोदर पंत चे प्रयोग लागलेत परत, जाऊन बघूया, पहिले तर विश्वासच नाही बसला, पण नंतर फार आनंद झाला, आमचं ठरलं की जाऊया म्हणून पण कुठेतरी माशी शिंकली आणि या प्लॅनचा सुद्धा गोवा झाला. सहसा मला काही वाटत नाही पण यावेळी वाईट वाटलं. नाही पाहिलं तर काहीतरी राहून जाईल आयुष्यात असं वाटलं.

मला आठवतंय आम्ही लहान असताना DVD Player घेतला होता, आणि तेव्हा 5in1 DVDs मिळायच्या. बाबांनी एकदा खूप मोठा साठा आणलेला DVDs चा, त्यात ६-७ DVDs होत्या मराठी नाटकांच्या, गीतरामायणाचा आख्खा संच होता, आणि सुद्धा बरंच काही होतं, त्या DVDs पैकी पहिली हाताला लागली ती DVD लावली, त्यातलं पहिलं नाटक होतं – श्रीमंत दामोदर पंत. माझ्या आयुष्यात पाहिलेलं पाहिलं नाटक. बाबा म्हणतात लहान असताना एकदा शिवाजी मंदिरला एका लग्नाची गोष्ट बघायला घेऊन गेलेले पण तेव्हा मी ३–४ वर्षांचा होतो, त्या मुळे आठवणीतलं पहिलं नाटक हे ‘श्रीमंत दामोदर पंत’च.

बघताक्षणी प्रेमात पडलो होतो मी या नाटकाच्या आणि सगळ्या कलाकारांच्या. काही वेळाने DVD Players कालबाह्य झाले, पण या नाटकाची युट्यूब वर पारायणं केली.

काळ बदलला, तंत्र बदललं, पण आमची श्रद्धास्थानं मात्र होती तीच राहिली.

Comfort Zone होतं हे नाटक म्हणजे. अक्षरशः सगळे डायलॉग पाठ झाले होते.

“ओळखतो मी सगळ्यांना ओळखतो”, “थांबा, मी माझ्या तल्लख बुद्धीने सांगतो”, “वरून पाचवा फोटो”, “फोटोच नाहीये”, “गणपत… गणू गणू गणू गणू गणू…!” “फ्रीज आहे ना आमच्याकडे!” 😂

म्हणूनच, जेव्हा प्लॅन कॅन्सल झाला, तेव्हा राहवलंच नाही, म्हटलं कोणी नाही आलं तरी चालेल, मी एकटा जाईन, पण हे नाटक miss करणार नाही. असं म्हणून मी पाहिले पार्ल्याच्या प्रयोगाची २ तिकिटं काढली आणि म्हटलं बघू, कोणाला वाटलंच सोबत यावं असं, तर तिकीट नाही असं नको व्हायला. त्यात संध्याकाळी ४.३० वाजताचं नाटक, म्हणजे कुठलेही चाकरमानी मित्र मैत्रिणी यायची सुतराम शक्यता नव्हती. २–३ लोकांना विचारलं, एक मैत्रीण म्हणाली की तिला पण यायचंय तर प्लॅन ठरला. त्या वेळी ते एक वाक्य वाचलेलं आठवलं त्याची खात्री पटली,
तुम्हाला कुठेतरी जायचंय तर चालायला सुरुवात करा, कोणाची वाट पाहात बसू नका, रस्त्यात तुम्हाला समविचारी लोकं भेटतीलच!

नाटकाला जायचं म्हणून २ मीटिंग ठरवल्या त्या आधी. कारण आम्ही हाडाचे कर्जतकर! एका गोष्टीसाठी कर्जतमधून बाहेर पडायचं म्हणजे दिवस अपूर्ण! २–३ कामं तरी झाली पाहिजे नाहीतर तेवढी माणसं तरी भेटली पाहिजेत. 😂

ते सगळं आटपून नाटकाला ५ मिनिटं असताना पोचलो, मैत्रीण भेटली. आत जाऊन बसलो, आणि प्रयोग सुरू झाला! तिसरी घंटा झाली, पडदा उघडला आणि दामू एक- एक करून देवांच्या फोटोला नमस्कार करत होता.

त्यानंतर जी सुरुवात झाली ती झालीच. नाटकाला आलेल्या जवळजवळ प्रत्येकाला नाटक पाठ होतं. त्या मुळे शिट्या टाळ्या आणि हशा यांची यथेच्छ उधळपट्टी चालू होती!

खरं सांगतो तुम्हाला, एक-एक डायलॉग ऐकताना, एक-एक सीन बघताना असं वाटत होतं की कोणीतरी माझं बालपणच आणून ठेवलंय माझ्या डोळ्यासमोर..

सगळ्यात जास्त आठवण येत होती ती विजय चव्हाणांची! कमलाकर सातपुते करत होते ती भूमिका आता, आणि खूप छान पेललंय ते शिवधनुष्य त्यांनी, पण विजय चव्हाणांची आठवण पावलापावलावर येत होती, प्रत्येक क्षणी! खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे म्हणजे काय हे त्या माणसाने दाखवून दिलं!! नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांशी संवाद साधताना भरत जाधव सुद्धा रडले विजय चव्हाणांची आठवण काढून!

नाटक संपलं तेव्हा प्रेक्षकांनी ३ मिनिटांचं standing ovation दिलं. सगळ्यांनाच भरून आलं होतं. सगळ्यांनी त्याचं बालपण time capsule मधून बाहेर आलेल्या आठवणींसारखं अनुभवलं होतं. बाहेर पडताना खूप समाधान होतं माझ्या चेहऱ्यावर, सुख यालाच म्हणतात!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top